Big Breaking News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब टाकून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआय चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचा हा निकाल अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालानंतर आता भाजपचे नेते पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच आता न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांनी पायउतार व्हावे, अशी आक्रमक मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अनिल देशमुखांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
‘अनिल देशमुखांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा’
उच्च न्यायालायाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता अनिल देशमुख यांनी पदावर राहणे योग्य नाही. अनिल देशमुख यांनी आता राजीनामा द्यायला हवा. त्यांनी तो दिला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो घ्यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरे जावे, त्यामध्ये निर्दोषत्त्व सिद्ध झाल्यास अनिल देशमुख यांना परत मंत्रिमंडळात घ्यावे. त्याला कोणाचीही ना नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
15 दिवसांमध्ये चौकशी करा
मुंबई हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
अनिल देशमुख काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले होते. माझ्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. मी पैशांचा कोणताही व्यवहार केलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते.

0 Comments